Panjabrao Dakh Weather: राज्यात 20 मार्चनंतर अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये आकाश ढगांनी व्यापलेले राहील. 20 मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र, 20 मार्चनंतर हवामानात मोठा बदल होऊन राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतीची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहे हवामान बदलांची कारणे?
20 मार्चनंतर हवामानात होणाऱ्या बदलाचे प्रमुख कारण पश्चिमी झंझावात आणि दक्षिणेकडून येणारे आर्द्र वारे आहेत. पश्चिमी झंझावातामुळे उत्तर भारतात थंडीचा प्रभाव जाणवतो आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या रूपात होतो. याशिवाय, दक्षिणेकडून वाहणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात अधिक बदल होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते. या प्रभावामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचीही शक्यता आहे.
20 मार्चपासून संभाव्य अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि अन्य पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काढणीस आलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत, असा सल्ला डख त्यांनी दिला. पाऊस पडल्यास उघड्यावर ठेवलेला शेतमाल भिजून मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर पिकांची काढणी पूर्ण करावी. त्यांनी शेतकऱ्यांना मजूर आणि यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाच्या आधी काढणी वेगाने पूर्ण करता येईल. याशिवाय, केळी, संत्री, द्राक्षे यांसारख्या फळपिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक धोका
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, अवकाळी पावसाचा सर्वाधिक धोका पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांना आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर; मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळ; तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये विशेष सतर्क राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
हवामान विभाग काय म्हणतो?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसारही मार्च महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात हवामान बदलण्याची शक्यता आहे. पश्चिमी झंझावात आणि आर्द्र वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजानुसार त्वरित उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत योग्य पावले उचलल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल आणि शेतीसाठी आवश्यक संरक्षण करता येईल.
Social Plugin