Hot Posts

6/recent/ticker-posts

Vaijapur Crime News Analysis | चिंतनीय: वैजापूर तालुका कोणत्या दिशेने चालला? दोन खुनासह दुकानांची तोडफोड, जाळपोळ!

कुणी दिशादर्शक आहे का?

वैजापूर: गेल्या आठवड्यात तालुक्यात दोन घटना हादरून टाकणाऱ्या घडल्या. एका तरुणासह महिलेच्या खुनानंतर तालुक्यातील वातावरण ढवळून तर निघालेच. परंतु या पाठोपाठ घडलेल्या घटनांनी समाजमन सुन्न झाले. या घटनांमुळे तालुक्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.


पूर्व वैमनस्यातून तालुक्यातील खंडाळा येथे १२ रोजी जून दोन गटांत 'राडा' होऊन मोईन शहा या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात आगडोंब उसळला अन् पोलिसांसह अख्खं गाव वेठीला धरले गेले. घटना झाली ते नक्कीच वाईट आहे. शेवटी हत्येची घटना समर्थनीय होऊच शकत नाही. काही झालं तरी कायदा हा श्रेष्ठ असतो अन् त्याचे पालन झालेच पाहिजे. परंतु प्रतिउत्तरा दाखल गावातील दुकानांच्या तोडफोडीसह जाळपोळ ही कितपत समर्थनीय आहे? हाही चिंतनाचा विषय आहे. 

या घटनेतील सात जणांना पोलिसांनी गजाआड केले तसे जाळपोळ करणाऱ्या ३७ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला. ज्या दोन गटांत राडा झाला. त्यात सर्व तरुण वर्ग आहे. पंचवीशीतील तरुणाईची छोट्यामोठ्या कारवाणांवरून चाकूने भोसकण्यापर्यंत मजल जाते. याचाच अर्थ राग, व्देष, मत्सर, असूया किती पराकोटीपर्यंत जाऊन पोहोचली. यावर मंथन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले. गुन्हाही दाखल झाला. परंतु प्रत्येक ठिकाणी पोलिस पोहोचतील अन् अशा घटनांना आवर घालतील. सर्व जबाबदारी पोलिसांवर ढकलून चालणार नाही. हा गैरसमज दूर करावा लागणार आहे. 

गाव असो शहर. सामाजिक सलोखा ठेवण्याचे काम अगोदर नागरिकांचे आहे. समाज माध्यमातून सामाजिक सलोखा, बांधिलकीच्या 'गप्पा' झोडणारे वेळ आली की, ते किती संकुचित असतात? याची प्रचीती यापूर्वीही वारंवार आलेली आहे. समाज माध्यमांवर मोठं तत्वज्ञान अथवा उपदेशाचे 'डोस' पाजळले म्हणजे आपली जबाबदारी संपली किंवा आपण फार मोठे समाजसेवक आहोत. असा पायंडा काही दिवसांपासून तालुक्यात सुरू झाला. 

परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा असे 'ऑनलाईन समाजसेवक' शेपूट घालून विजनवासात जातात. त्यामुळे अशा घटनांना आळा बसणार नसेल तर हा नंगानाच वाढत जाईल अन् दोन समाजात, समुदायात सामाजिक दरी वाढत जाईल. 

दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील राहेगावात अंगणवाडी सेविका असलेल्या अनिता शेलारचा (५५) पोस्टमन पती चांगदेव शेलारने बळी घेतला. ही घटना १४ जूनच्या रात्री घडली. आयुष्याच्या उत्तरार्धात नातवांसोबत खेळण्या-बागडण्याच्या वयात चांगदेवने पत्नीचा रक्तरंजित शेवट केला. कोयत्याने सपासप वार करून पत्नीला संपवून तो जेलमध्ये 'सरकारी पाहुणा' झाला.

 एकीकडे तरुणाई भरटकत चालल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना ही सणसणीत चपराक म्हणावी लागेल. आयुष्याच्या उत्तरार्धात नातवापंतांचे धनी झालेली माणसं जर असा रक्तरंजित शेवट करत असतील तर मानसिकता कुठं चाललीय? त्यामुळे चोहोबाजूंनी आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपलीय.

 समुपदेशन करायचे कुणा कुणाचे? असं असेल तर शिक्षणाचा फायदा काय? शिक्षित आणि अशिक्षितांमध्ये पुसटशी रेषा शिल्लक आहे. मोबाईल स्मार्ट झाले. परंतु माणसं स्मार्ट व्हायला तयार नाही. समाजाने सर्व बदल स्वीकारले. पण एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) युगात बुरसटलेली मानसिकता बदलायला तयार नाही. मुळात अशा घटनांमुळे समाजाला कुणी दिशादर्शक राहिला नाही का? असा प्रश्न आपसूकच पडू लागला आहे. 

पोलिस पाटलांची 'मांडवली'

ग्रामीण भागात जेव्हा घटना घडतात. तेव्हा पोलिस पाटलांची भूमिका महत्त्वाची असते. या घटनांची माहिती त्यांनी पोलिसांना अगोदर कळवणे अपेक्षित आहे. परंतु या घटना पोलिसांना समाज माध्यमातून माहिती होतात. पोलिस पाटील आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक न राहता गावगाड्यात 'पाटीलकी' करून 'मांडवली' करण्याची भूमिका बजावतात. वास्तविक पाहता शासनाचा पगार घेऊन त्यांचा मांडवली करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे या पाटलांना 'कानपिचक्या' देण्याची गरज आहे.

शांतता की अशांतता समिती?

वैजापूर पोलिस ठाण्याकडून गठित करण्यात आलेली शांतता समितीचे केवळ नावापुरतेच अस्तित्व टिकवून आहे. या समितीत सर्वसमावेशक सदस्य संख्या असणं आवश्यक आहे. परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून या समितीचे अस्तित्व उरले. यातील काही सदस्य पोलिसांसोबत संबंध 'वृद्धिंगत' करण्यासाठीच आहे का? असाही प्रश्न पडू लागला आहे. यातील किती सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत? याचाही पोलिसांनी शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे ही शांतता समिती आहे की अशांतता समिती? असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहे?

#Khandla News #Chhatrapati Sambhajinagar #Vaijapur police station