तिघींनाही पोलिसांनी केली अटक
वैजापूर शहरातील बसस्थानक परिसरासह बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा वैजापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपी महिला असल्याने त्यांना न्यायालयाची परवानगी घेत रात्री उशिरा अटक करण्यात आली.
माला कॅप्टन लोंढे (वय ३५), कांताबाई कमल लोंढे (वय ६४) व गीता संतोष बन्सी (वय ३५) तिघेही रा. श्रीरामपूर शहर (जिल्हा अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळी उशिरा वैजापूर पोलिसांना एका खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली की, उपरोक्त तीन संशयित महिला बसस्थानक परिसरात फिरत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचारी सीमा जाधव, योगेश झाल्टे बसस्थानकात पोहोचले व तिन्हीही महिलांची चौकशी सुरू केली असता प्रश्नांची उत्तरे समाधानकारक न मिळाल्याने त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान त्यांनी पोलिसांना सांगितले की, एक महिन्यापूर्वी ते वैजापूर बसस्थानकात आले होते. त्यांनी ज्योती पवार नावाच्या महिलेचे दागिने चोरले होते. त्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये १९ ग्रॅम वजनाचे ३३,६०० रुपये किमतीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केल्यानंतर, पोलिस कर्मचारी सीमा जाधव यांनी त्यांना अटक केली.
गेल्या काही महिन्यांत वैजापूर बसस्थानकाच्या आवारात डझनभर चोरीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु आरोपींचा कोणताही सुगावा लागला नाही. उपरोक्त तीन आरोपींना अटक करण्यात आल्यामुळे तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूरच्या महिलांना अटक करण्यात आल्यामुळे बसस्थानकाच्या आवारात चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या संदर्भात तक्रारदार पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. मंगळवारी तपास अधिकारी सीमा जाधव यांनी आरोपींना वैजापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या परवानगीने अटक
दरम्यान महिलांना रात्री अटक करता येत नाही असा कायदा आहे. त्यामुळे पोलिसांना त्या महिला आरोपींना अटक करता आली नाही. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपास अधिकारी आणि कृती पथकाला मार्गदर्शन केले. त्यामुळे रात्री उशिरा वैजापूर न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए. खान यांची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर आरोपी महिलांना अटक करण्यात आली.
पदभार घेताच टोळी जेरबंद
गेल्या काही दिवसांत म्हणजेच सन २०२३ - २४ मध्ये या दोन वर्षांत बसस्थानक परिसरात महिलांच्या दागिने चोरीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या आहेत. या घटनांची पोलिस दप्तरी नोंदही आहे. परंतु गुन्ह्यांचा तपास थंडबस्त्यात आहे. नूतन ठाणेप्रमुख सत्यजित ताईतवाले यांनी पदभार घेताच दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना गजाआड केले आहे.
Social Plugin