Hot Posts

6/recent/ticker-posts

Agristack Ragistration | 'आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास'; ॲग्रीस्टॅक पोर्टलचा लहरीपणा

 वेगवेगळ्या शेतीमुळे शेतकऱ्यांना अडचणी


वैजापूर: ॲग्रीस्टॅक नोंदणीत तालुका अगोदरच पिछाडीवर असताना या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पोर्टलचा खोळंबा तर आहेच. परंतु दुसरीकडे एका शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या गावांत शेतजमीन असेल तर पोर्टलवर त्याचा समावेश करण्यात अडचणी निर्माण होऊन नोंदणी होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणीत 'आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास' अशी अवस्था निर्माण झाली आहे.


शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक ( फार्मर आयडी) अनिवार्य केला असून ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी अनिवार्य आहे. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर येथे नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फैलावर घेतले होते. ॲग्रीस्टॅक नोंदणीचे काम समाधानकारक नसल्याने स्वामींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

 त्यानंतर उपविभागीय अधिकारी डाॅ. अरुण जऱ्हाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणीबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. याशिवाय या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तब्बल १९ ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायकांना नोटीस देऊन सक्त ताकीदही दिली होती. एकीकडे ॲग्रीस्टॅक नोंदणीची लगीनघाई सुरू असतानाच दुसरीकडे या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागत आहे. 

पोर्टलचा वारंवार होणारा खोळंबा, मजकूर फीड करतांना होणाऱ्या कसरतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्या पुढचा कहर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या गावांत शेतजमीन असेल तर ही माहिती पोर्टलवर सबमिट होत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु एकाच ठिकाणी असलेली शेतजमीन पोर्टल सहज स्वीकारते. 

तालुक्यात असे बहुतांश शेतकरी आहेत की, ज्यांच्या वेगवेगळ्या गावांत शेतजमीनी आहेत. एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या शेतजमीनींमुळे नोंदणीसाठी नाना अडचणी निर्माण होत आहे. याबाबत जबाबदार अधिकारी अथवा कोणत्याही यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे.

 दरम्यान गेल्या आठवड्यात प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण ९८,६९८ शेतकऱ्यांपैकी केवळ ६६,०१४ शेतकऱ्यांचीच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झाली आहे. उर्वरित ३२,६८४ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. प्रशासनाने हा दावा केला असला तरी त्यात तथ्य किती? हे मात्र त्यांनाच ठाऊक आहे. 

एकंदरीतच प्रशासनाकडून होत असलेली नोंदणीची लगीनघाई अन् दुसरीकडे 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' अशा परिस्थितीत ही नोंदणी कशी व कधी पूर्णत्वास जाईल? हे मात्र येणाऱ्या काळात समजणार आहे.


ॲग्रीस्टॅक नोंदणीबाबबत एकापेक्षा जास्त ठिकाणच्या क्षेत्राबाबत अडचणी निर्माण होत असेल तर याबाबत मला माहिती घ्यावी लागेल. अशा अडचणी येत असेल तर त्यावर पर्याय काढून अडचण दूर करण्यात येईल.

- डॉ. अरुण जऱ्हाड, उपविभागीय अधिकारी, वैजापूर 


शासनाच्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी पोर्टल संथगतीने चालते. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या गावांत शेतजमीन असेल तर ती माहिती पोर्टल सबमिट करून घेत नाही. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना नाईलाजाने माघारी पाठवावे लागत आहे. याबाबत आमचाही नाईलाज आहे.

- नीलेश गायकवाड, संगणकचालक, वैजापूर


कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तरे नाही

याबाबत ॲग्रीस्टॅकच्या कस्टमर केअरशीही शेतकरी संपर्क साधून विचारणा करीत आहेत. परंतु तिकडूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. कस्टमर केअर व शेतकऱ्यांच्या बोलण्यात ताळमेळ बसत नसल्यामुळे एकंदरीतच गोंधळाची परिस्थिती आहे