पालिकेच्या गलथान कारभारावर नाराजी
वैजापूर: जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अचानकच वैजापूरला भेट (Collector's surprise visit) दिल्याने विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. सकाळी डाॅट ११ वाजता ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचताच सर्व कार्यालयप्रमुखांना बैठकीस येण्याचे फर्मान सोडले. या प्रलंबित रस्त्यांच्या प्रकरणांसह ॲग्रीस्टॅक नोंदणी, पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. विशेषतः परविनगीशिवाय कार्यालयास दांडी मारणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच ज्या कार्यालयात 'झिरो' तलाठी कार्यरत असतील, त्यांना हाकलून लावा. अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी कुणालाही वर्दी न देता सकाळी ११ वाजता थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात येऊन बैठकीचे फर्मान सोडल्यामुळे सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी आहे त्या परिस्थितीत कार्यालय गाठले. बहुतांश अधिकाऱ्यांकडे डाटा तयार नसतानाही बैठकीला जाण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध शासकीय कार्यालयातील कामांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. तहसील कार्यालयात शेतरस्त्यांच्या प्रकरणांसह संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी विविध योजनेच्या संचिका धुळखात पडून आहेत. विशेषतः शेतरस्त्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. ॲग्रीस्टॅक नोंदणीबाबत समाधानकारक काम नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदरीतच तहसील कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिक जेरीस आलेला असताना अधिकाऱ्यांकडून केवळ 'पाट्या' टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याबाबत स्वामींनी संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले.
पंचायत समितीच्या कारभाराचेही असेच धिंडवडे निघाले असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची अनियमिततेवर जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले. विहिरींसह घरकुल, गायगोठ्यांची कुशल व अकुशल कामांचे पैसे लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयप्रमुखांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
याशिवाय शहराच्या नागरी समस्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचे स्वामींनी सांगून मान्सूनपूर्व कामे झाली की नाही? या प्रश्नावर मात्र अधिकाऱ्यांनी चुप्पी साधून होते. नालेसफाईसह ट्री - कटिंग आदी कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु शहरातील गटारगंगा आहे त्या परिस्थितीत आहे. असे मला समजले असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय शहरासह तालुक्यातील विविध तलाठी सज्जा कार्यालयांमध्ये 'झिरो' तलाठी ठाण मांडून बसले आहेत. अशा हिरो तलाठ्यांना हाकलून लावा. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. झिरो तलाठ्यांच्या भरवशावर कामकाज चालणार असेल तर ही चिंताजनक बाब आहे. झिरो तलाठ्यांच्या हातून कामकाज होणार असेल तर मग तलाठ्यांची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून यापुढे हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. असा दमच त्यांनी भरला.
तसेच कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय कार्यालयास दांडी मारायची नाही. तसे झाल्यास कार्यालयप्रमुखांनी त्यांच्यावर बेधडक कारवाई करा. असे आदेशही स्वामी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपमुख्याधिकारी राहुल साठे, मंडळाधिकारी जितेंद्र चापानेरकर, तलाठी गजानन जाधव आदींसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कानपिचक्या अन् परिणाम!
दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी अचानकच भेट देऊन अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या खऱ्या. प्रलंबित कामांबाबत सर्वच अधिकाऱ्यांना फैलावर घेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु याचा परिणाम होतो किंवा नाही. हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.
नागरी समस्यांना प्राधान्य द्या!
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरी समस्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असून वर्तमानपत्रातूनही पालिकेच्या कारभाराची वाभाडे वाचायला मिळाली. त्यामुळे ही गंभीर बाब असून नागरिकांच्या समस्यांबाबत जागृत राहून प्राधान्य देणे पालिकेचे आद्यकर्तव्य आहे. असेही ते म्हणाले.
Social Plugin