Hot Posts

6/recent/ticker-posts

Administration of Talathi | साहेब, जरा 'अप्पां'कडेही लक्ष द्या हो! वैजापुरातून तलाठी सज्जांचा कारभार

वर्षानुवर्षांपासून सुरू आहे 'परंपरा'


वैजापूर: शहरानजीक असलेल्या जवळपास २०  गावांतील तलाठी सज्जा कार्यालयांचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून शहरातून सुरू आहे. या गावांचा कारभार शहरातून सुरु असल्याने 'अप्पा' मंडळी गावाकडे फिरकतच नाही. महसूल अधिकाऱ्यांचा अप्पामंडळीवर वरदहस्त असल्याने ही 'परंपरा' गेल्या अनेक वर्षांपासून अशीच अव्याहतपणे सुरू आहे.  त्यामुळे या गावांतील नागरिकांना किरकोळ कामासाठी शहरातील उंबरठे झिजवावे लागतात. विशेष म्हणजे सज्जांचा कारभार पाहण्यासाठी अप्पा मंडळीनी 'झिरो' तलाठ्यांची नियुक्ती केली  आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एकीकडे 'झिरो' तलाठ्यांना हाकलून लावण्याचे फर्मान सोडलेले असतानाच दुसरीकडे शहरानजीकच्या सज्जा कार्यालयांचा 'दरबार' शहरात भरविला जातो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 'अप्पा' मंडळींचे कान टोचण्याची आवश्यकता आहे. या गावांतील नागरिक साहेब, जरा अप्पांकडेही लक्ष द्या! असा टाहो फोडत आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी वैजापुरात येऊन प्रशासकीय कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या खऱ्या. विशेषतः महसूल विभागाच्या कामकाजाबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी 'झिरो' तलाठ्यांना हाकलून लावण्याचे फर्मान सोडले खरे; परंतु त्यापुढचा कहर म्हणजे शहरानजीकच्या जवळपास २० पेक्षा जास्त गावांतील तलाठी सज्जा कार्यालये शहरातच थाटण्यात आले आहे.  

तलाठी म्हटले की, नागरिकांसह विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्रापासून  ते जात प्रमाणपत्र, नाॅन क्रिमीलीयर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, सातबारा व आठ 'अ' उताऱ्यांचे काम पडते. या गावांशी संबंधित असलेले सर्वच तलाठी सज्जा कार्यालये हे तलाठ्यांनी वैजापूर शहरात थाटले आहे.  ग्राहक ग्रामीण भागात परंतु त्यांनी दुकाने शहरात थाटली आहेत. त्यापुढचा कहर म्हणजे यातील अपवाद वगळता बहुतांश अप्पामंडळी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ही 'सर्कस' चालवितात.  

त्यामुळे  या लहानसहान कामांसाठी शहरानजीक असलेल्या गावातील नागरिक व विद्यार्थ्यांना वैजापूर शहराच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. त्यातही अप्पा अथवा त्यांचे नियुक्त केलेले 'झिरो' तलाठी सापडतीलच, याची शाश्वती नाही. अप्पा मंडळी त्यांच्या सज्जेतर्गंत गावात एखादा प्रशासकीय कार्यक्रम असेल तरच चेहरा दाखवितात. याशिवाय ते गावाकडे फिरकतच नाही. 

मंडळाधिकारी, तलाठी व झिरो तलाठी हे तिघेही शहरातील एकाच छताखाली असतात.   गेल्या कित्येक वर्षांपासून तलाठ्यांची ही 'परंपरा' अशीच अव्याहतपणे सुरू आहे. या खुलेआम कारभाराची महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असूनही त्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असून यासाठी जणू या अधिकाऱ्यांची अलिखित परवानगी आहे की काय? असेच चित्र शहरात पहावयास  मिळते. 

या तलाठ्यांनी त्यांच्या सज्जेनुसार  गावांच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर गाळे  भाडोत्री घेवून सज्जा कार्यालये थाटली आहेत. यादरम्यान तलाठ्याची बदली झाली तर शासन नियमानुसार पदभार देण्याघेण्याची प्रक्रिया पार पडते. परंतु गाळा तोच अन् झिरो तलाठी तोच राहतो. सज्जेच्या गावात जावून कार्यालय सुरु करण्याची नवीन परंपरा सुरु करण्यास कोणीच धजावत नाही. 

जुन्या तलाठ्याने सुरु केलेली परंपरा तशीच पुढे ठेवली जाते. या काळात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार बदलले. परंतु कोणत्याही महसूल अधिकाऱ्यांनी या अप्पामंडळीना सज्जा कार्यालय  गावाच्या ठिकाणी असायला हवे. अशी सक्ती अथवा फर्मान सोडले नाही. अप्पामंडळीना त्यांच्या सोयीनुसार काम उरकून जिल्ह्याचे ठिकाण गाठायचे असल्याने शहराच्या ठिकाणी सजा कार्यालये थाटली आहेत. 

त्यामुळे आता तलाठ्यांची शहरात कार्यालय सुरू ठेवण्याची परंपरा आणखी किती वर्षे सुरु राहते? हे मात्र महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व संबंधित तलाठ्यांनाच ठाऊक. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अप्पांच्या या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. ही कार्यालये गावांमध्ये थाटली जात नाही.  तोपर्यंत मात्र संबंधित सज्जेच्या गावातील नागरिकांच्या नशीबी असेच हेलपाटे मारण्याचा वनवास राहणार आहे. एवढे मात्र निश्चित.

      गावातच असायला हवी कार्यालये

दरम्यान  तलाठी सज्जा कार्यालये ही नियुक्त केलेल्या गावातच असायला हवी. कार्यालये ही शहरात न थाटता गावांत थाटायला पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. ही रास्त बाब आहे.  सज्जा कार्यालये शहरात न थाटता गावात ठेवा. अशा सूचनाही तत्कालीन तहसीलदारांनी दिल्या होत्या. परंतु संबंधित मुजोर तलाठ्यांनी तहसीलदारांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली.