Hot Posts

6/recent/ticker-posts

Vaijapur APMC | 'कृउबा' संचालकांत बेबनाव! सभापती भाजपच्या वाटेवर?

 व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना गंडविल्याचे प्रकरण 

वैजापूर: अडत व्यापाऱ्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडविल्यानंतर या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम देण्यावरून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Vaijapur Agricultural Produce Market Committee) संचालकांमध्ये बेबनाव सुरू झाला आहे. या ओढाताणीत सभापतींनी कातडीबचाव धोरण स्वीकारले असून उगाच 'झेंगाट' नको म्हणून शिंदेसेना सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शेवट नेमका काय व कसा होतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

साधारणतः सहा महिन्यांपासून कांदा प्रकरणाचे 'कवित्व' सुरू आहे. व्यापारी  सागर राजपूत याने चारशे शेतकऱ्यांना जवळपास २ कोटींना गंडा घातला होता. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी रक्कम मिळण्यासाठी उपोषण, आंदोलने करून तगादा लावला. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांना ४० टक्के रक्कम अदा केल्यानंतर प्रकरण काही दिवसांपासून निवळले होते. परंतु गेल्या आठवड्यात या प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली अन् शेतकरी इरेला पेटले. बाजार समितीच्या कार्यालयात आंदोलन करीत कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून टाकले.
त्यानंतर आता या शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरात 'उपोषणास्त्र' उपसले आहे. त्यामुळे सभापतींसह संचालक मंडळाची पुन्हा एकदा पाचावर धारण बसली आहे. गेल्या चार दिवसांपासून तेथे उपोषण सुरू आहे तर इकडे संचालक मंडळाच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजप गोटातील आठ संचालकांनी सभापतींना लेखी पत्र देऊन शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी केली आहे. 
१७ एप्रिल रोजी  मंत्रालयात  पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन बैठकीत एक कोटी ७९ लाख २३ हजार या रकमेच्या ५०% रक्कम बाजार समितीच्या निधीतून देण्याबाबत आदेशीत केले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली १५ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वच संचालकांनी  पणन संचालक (पुणे) यांची  परवानगी घेऊन शेतकऱ्यांना  त्यांची रक्कम देण्यात यावी. असा ठराव पारित केला होता. 
परंतु आता केवळ आठ संचालकांनी आता शेतकऱ्यांना पणन संचालकांची परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही रक्कम बाजार समितीकडे जमा होणाऱ्या सेजमधून देण्यात येऊन हा विषय निकाली काढावा. असं मत या पत्रातून व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या रकमेवरून आता भाजप - शिवसेनेच्या संचालकांत ठिणगी पडली असून याबाबत मतमतांतरे आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. 

भाजपच्या संचालकांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर दुसरीकडे शिवसेनेच्या संचालकांची भूमिकाही शेतकऱ्यांच्याच बाजूने असली तरी दोन्हीही पक्षातील संचालकांमध्ये मतप्रवाह आहेत. या 'घबाडग्यात' सभापती रामहरी जाधवांसह कर्मचाऱ्यांचे मात्र 'सॅंडविच' होत आहे. दरम्यान भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे यांनी संभाजीनगर येथे उपोषणार्थींची भेट घेतली.

सभापतींच्या हृदयाचे वाढले 'ठोके'

कांदा प्रकरणावर शेतकरी आक्रमक झाले असून सभापती रामहरी जाधवांवर दबाव वाढला आहे. साधारणतः सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या राड्यामुळे त्यांच्या हृदयाचे 'ठोके' वाढले आहेत. परिणामी ते शिंदेसेना सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

कांदा प्रकरण थेट विधानसभेत!

दरम्यानच्या काळात आमदार रमेश बोरनारे यांनी याबाबत विधानसभेतही आवाज उठविला होता. संबंधित मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असले तरी ठोस आश्वासन दिले नव्हते. प्रकरण विधानसभेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची भाबडी आशा होती. याशिवाय आ. बोरनारे यांनी नागपूर अधिवेशन सुरू असतानाही हा विषय उचलून धरला. याशिवाय संचालकांना सोबत घेऊन मुंबई वारीही केली. विशेषतः शेतकऱ्यांना रक्कम मिळवून देण्यासाठी बोरनारे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परंतु एकंदीत शेतकऱ्यांच्या पदरात रक्कम पडते किंवा नाही? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

 

मी शिंदेसेना सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी त्यात काही तथ्य नाही. मी भाजपमध्ये कदापि जाणार नाही.
रामहरी जाधव, सभापती, वैजापूर