Hot Posts

6/recent/ticker-posts

Rainfall News | दाणादाण: सोलर पॅनलसह घर, गायगोठे, कांदाचाळींचे उडाले छत; रोहित्र, झाडे पडली उन्मळून, कांदाचाळीवर कोसळली वीज!

 मृग नक्षत्राच्या पावसाने उडाली दाणादाण!


वैजापूर तालुक्यात शनिवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे पालखेडसह परिसरातील गावांमध्ये मोठी दाणादाण उडाली. वादळामुळे परिसरात घरांसह कांदाचाळ, गायगोठ्यांवरील पत्रे तसेच सोलार पॅनल उडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे व विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आपदग्रस्तांकडून होत आहे. दरम्यान या परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले तर बोरनदीतूनही पाणी वाहू लागले. तालुक्यातील नादी येथे कांदाचाळीवर वीज कोसळून सहा ट्रॅक्टर कांदे जळून खाक झाले.


 तालुक्यात शनिवारी दुपारनंतर  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बोर दहेगाव, पालखेड, गोळवाडी, करंजगाव, परसोडा, बेंदवाडी, राहेगव्हाण परिसरात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली. मोठमोठी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा तुटल्या, रोहित्रे कोसळली, काही शेतकऱ्यांचे शेड नेट उडाले, सोलार पॅनल  उडून नुकसान झाले. बोरदहेगाव येथील रामभाऊ शेलार यांच्या गट क्रमांक १८२ मधील घरावरील सर्व पत्रे उडाली. अन्नधान्याचे नुकसान झाले. त्यांची राहण्याची पंचाईत झाली. 


परसोडा येथील बाबुलाल मरमट यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडाली. त्यांची राहण्याची अडचण झाली. बोर दहेगाव येथील रमेश उगले यांच्या गट क्रमांक १७६ मधील शेतात पाणी साचले. गोटीराम उगले यांच्या घरासमोरील लिंबाचे झाड कोसळले. जगन्नाथ उगले यांच्या जांभळाचे झाड पडून नुकसान झाले. 


गोळवाडी येथे एकनाथ वाघचौरे यांच्या शेतातील सौर मोटारीचे पॅनल उडाल्याने नुकसान झाले. पालखेड येथील शिवप्रसाद घोडके यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर झाड पडून नुकसान झाले. पालखेड-बोर दहेगाव रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. धनाड वस्तीवरील रोहित्र कोसळले. गोळवाडी शिवारात विजय कुमावत यांच्या गट क्रमांक १३ मधील शेडनेट उडाले. मोहन पगार यांच्या गट क्रमांक १५ मधील आणि संताराम पगार यांच्या शेतातील सौर पॅनल उडाले. गट क्रमांक १२ मधील बाळनाथ पगार आणि रघुनाथ पगार यांच्या शेतातील आंब्याचे झाड कोसळले. 


गोळीवाडी शिवारात अनिल वाणी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून शेताचे तळे झाले. एकंदरीतच शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय बोरनदीतून पाणी वाहत आहे. एकीकडे पावसामुळे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार सलामी दिल्याचा आनंद शेतकऱ्यांमध्ये आहे. 


या पावसाबाबत शेतकऱ्यांमध्ये मतमतांतरे असून हा मान्सूनपूर्व पाऊस की मान्सूनचा पाऊस? या संभ्रमात शेतकरी आहे. मान्सूनचा पाऊस अजून सक्रिय झाला नसल्याच्या बातम्याही माध्यमांतून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  परंतु असे असले तालुक्यात बहुतांश भागात अवकाळी पावसाच्या भिस्तीवरच शेतकऱ्यांनी पेरणी उरकण्याचा धडाका सुरू केला आहे.

वीज कोसळली अन् कांदाचाळ खाक झाली!

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नादी शिवारात एका कांदा चाळीवर वीज कोसळली घटनेनंतर कांदा चाळीला आग लागली. बघता बघता चाळीतील पाच ते सहा ट्रॅक्टर कांदे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच जळून खाक झाले. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार श्यामराव सखाहरी कदम रा. वीरगाव यांची नादी शिवारात गट क्रमांक २०५ मध्ये शेती आहे. या शेतात असलेल्या कांदा चाळीमध्ये त्यांनी कांदा साठवणूक केली होती.शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या कांदा चाळीवर वीज कोसळली. ज्यामुळे चाळीत आग लागून संपूर्ण कांदे जळून खाक झाले.या घटनेत कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.