सीओपदी भागवतांची पुन्हा वर्णी
वैजापूर: पालिकेच्या मुख्याधिकारीपदी भागवत बिघोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेत येताच शहरातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांनी जल्लोषात जंगी स्वागत केले. त्यांनी आज पदभार स्वीकारला. दरम्यान तत्कालीन मुख्याधिकारी संगीता नांदूरकरांची अवघ्या आठ महिन्यांत तडकाफडकी बदली तर भागवतांनी मुख्याधिकारी म्हणून 'हॅट्ट्रिक' साधली आहे.
वैजापूर शहरातील अस्वच्छतेच्या कारणावरून चर्चेत आलेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या उपआयुक्तपदी त्यांना पदस्थापना मिळाली. त्यांच्या जागी भागवत बिघोत यांची मुख्याधिकारीपदी नवीन नियुक्ती शासनाने केली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंगळवारी (२४ जून) याबाबतचे आदेश जारी केले. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ‘अ’ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी लागू असलेल्या नियमानुसार आणि प्रशासकीय कर्तव्यात विलंब टाळण्याच्या कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली.
बदलीमुळे रिक्त झालेल्या मुख्याधिकारी पदावर भागवत बिघोत यांची नियुक्ती झाली आहे. बिघोत यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करून २५ जून रोजी वैजापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिघोत यांनी मुख्याधिकारी म्हणून यापूर्वी दोन टर्म कारभार सांभाळला. आता पुन्हा रुजू होऊन त्यांनी 'हॅट्ट्रिक' साधली.
![]() |
संगीता नांदूरकर |
संगीता नांदूरकर यांनी आठ महिन्यांपूर्वी वैजापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्या विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरल्या होत्या. याशिवाय शहरावासीयांच्या रोषाच्याही धनी ठरल्या. माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी करून त्यांना पायउतार करण्यासाठी हात धुवून पाठीमागे लागले होते.
दरम्यान नांदूरकरांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाबाबत सातत्याने वाद निर्माण झाले. शहरातील स्वच्छतेची ढासळलेली अवस्था, कचरा संकलन व व्यवस्थापनामध्ये आलेली अनियमितता आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या 'ओढवून' घेतलेल्या नाराजीमुळे नांदूरकरांना खऱ्या अर्थाने 'सुरूंग' लागला अन् त्या औटघटकेच्या सीओ ठरल्या. वास्तविक पाहता गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी 'हालचाली' सुरू केल्या होत्या.
असं म्हणतात की, वेळ येते पण त्यासाठी 'वेळ' येऊ द्यावी लागते. तसंच काहीसं त्यांच्याबाबत झाले. 'माझी बदली होऊ शकत नाही' अशी नेहमीच 'डरकाळी' फोडून स्थानिक लोकप्रतिनिधींना डिवचल्याने ते सर्वच इरेला पेटले अन् त्यांचा 'गेम' झाला. गेम झाला म्हणण्यापेक्षा करून घेतला. असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. गेल्या चार-पाच महिन्यांपासून मंत्रालय स्तरावर बदलीची खिचडी 'शिजत' होती. यात कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. शेवटी रिझल्ट आला.
फटाके फोडून जल्लोष!
वैजापूकरांसह लोकप्रतिनिधींचा तर रोष ओढवून घेतलेलाच होता. परंतु पालिका कर्मचाऱ्यांनाही नेहमीच 'पाण्यात' पाहत असल्याने कर्मचाऱ्यांचाही त्यांनी रोष ओढवून घेतला. परिणामी बदलीचे वृत्त धडकताच फटाके वाजवून जल्लोष करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. एखाद्या वरिष्ठांच्या बदलीनंतर फटाके वाजवून जल्लोष करण्याचे शहरातील हे पहिलेच उदाहरण असावे. यापेक्षा अपमानास्पद काय असू शकते.
सरकारी उत्तरे.. हर्षोल्लास.. शब्दबंबाळ!
शेवटी शहर म्हटलं की, अडीअडचणी येणार हे सत्य असले तरी अडचणींवर मात करून समस्या धसास लावल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची. तिच कमतरता गेल्या आठ महिन्यांपासून भासत होती. शहराच्या झालेल्या गटारगंगेमुळे बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. सरकारी वेळेत आलेल्या अभ्यागतांना फक्त 'सरकारी' उत्तरे देऊन पिटाळून लावलेल्यांच्या बदलीचा 'हर्षोल्लास' नागरिक कसा साजरा करतात? हे अख्ख्या शहराने 'याची देही याची डोळा' अनुभवले. समस्या घेऊन आलेल्या अभ्यागतांना 'शब्दबंबाळ' करणं हा काही पराक्रम नक्कीच नाही. समस्या निराकरणासाठी शासनाने तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आणि त्याचेच तुम्ही गलेलठ्ठ वेतन घेता. याचं भान असायला हवं. परंतु याचा जणू विसर पडला होता. आजही पालिकेच्या निधीसह सफाईच्या निविदेचा विषय आहेच. परंतु भागवतांनी रूजू होताच याही परिस्थितीत 'डंके की चोट पर' शहराची साफसफाई हाती घेतली. हाच फरक या दोहोंच्यात आहे.
विकासाच्या चौकार, षटकारांची अपेक्षा ?
भागवत बिघोतांना नवे म्हणायचे की जुने? हा विषय तसा चर्वितचर्वणाचा आहे. त्यांना नवे म्हणता येणार नाही. त्यांनी वैजापूरसाठी यापूर्वी दोनदा मोठ्या 'मॅच' खेळलेल्या आहेत. आता पुन्हा अवघ्या आठ महिन्यांतच पुन्हा नवी 'इनिंग' खेळण्याची संधी मिळाली आहे. संधी मिळाली म्हणण्यापेक्षा त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली. असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. त्यामुळे स्वच्छतेसह नागरी समस्यांना त्रासलेल्या वैजापूकरांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. 'इनिंग'ची संधी मिळाली आता त्यांनी 'विकासाचे' चौकार, षटकार मारावेत. अशी रास्त अपेक्षा वैजापूरकरांची आहे.
#Bhagwat Bighot #Sangita Nandurkar #Vaijapur municipal council #Chhatrapati Sambhajinagar
Social Plugin